Shaktipeeth Expressway :महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘शक्तिपीठ महामार्ग’ च्या अंमल बजावणी एक मोठा बदल घडणार आहे. वर्धा ते रत्नागिरी असा प्रस्तावित असलेल्या या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेतून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. शक्तिपीठ महामार्ग — वर्धा पासून रत्नागिरीपर्यंत जाणारा हा महामार्ग १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. यामुळे राज्याच्या विविध भागांना अधिक चांगलं कनेक्टिव्हिटी मिळेल, असा सरकारचा दावा आहे.
होत असलेल्या आंदोलनाच्या रेट्यानंतर कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आलं आहे. तसा आदेश राज्य सरकारने पारित केला आहे. या मध्ये कोल्हापुरातील गावं वगळण्यात आली आहेत. त्यासंदर्भात पुन्हा गावकरी , नेते व संघटना यांचेसोबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचा उल्लेख देखील या आदेशात करण्यात आला आहे.
काय आहे शक्तिपीठ महामार्ग?
- उद्दिष्ट: Shaktipeeth Expressway हा महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी प्रस्तावित आहे. यामध्ये तीन शक्तिपीठे (माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी), दोन ज्योतिर्लिंग (औंढा नागनाथ, परळी वैजनाथ), तसेच पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर यांसारख्या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे.
- प्रस्तावित मार्ग: हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून सुरू होऊन यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत (गोवा सीमेवर) जाणार आहे.
- लांबी व खर्च: या महामार्गाची एकूण लांबी सुमारे ८०२ किलोमीटर असून, भूसंपादनासह प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे ८६ हजार कोटी रुपये अपेक्षित आहे.
Shaktipeeth Expressway :१२ पवित्र स्थळांना जोडणारा श्रद्धेचा सोनेरी मार्ग
वर्धा ते रत्नागिरी दरम्यान प्रस्तावित असलेला हा महामार्ग राज्यातील १२ महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांना आपसात जोडून ठेवणार आहे, ज्यामुळे भाविकांना सुलभ आणि वेगवान प्रवास शक्य होईल अस सरकारने हा प्रकल्प मंजुरी नंतर सांगितले आहे..
या महामार्गाच्या केंद्रस्थानी असलेली तीन महत्त्वाची शक्तिपीठं म्हणजे:
- कोल्हापूरची श्री महालक्ष्मी (अंबाबाई)
- तुळजापूरची तुळजाभवानी माता
- नांदेड जिल्ह्यातील माहूरची रेणुकामाता
हे तीन शक्तिपीठ एकमेकांशी प्रथमच थेट रस्तामार्गाने शक्तिपीठ महामार्ग मुळे जोडले जाणार आहेत
या व्यतिरिक्त, या महामार्गाद्वारे खालील नवीन धार्मिक स्थळांनाही एकत्रित जोडले जाणार आहे:
- परळी वैजनाथ (ज्योतिर्लिंग)
- हिंगोलीमधील औंढा नागनाथ (नागेश्वर ज्योतिर्लिंग)
- पंढरपूर – श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर
- सोलापूर – सिद्धरामेश्वर मंदिर
- अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ मठ
- गाणगापूर – श्री दत्तात्रेय मंदिर
- कारंजा (लाड) – समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थळ
- नृसिंहवाडी आणि औदुंबर – दत्त संप्रदायाशी निगडित तीर्थक्षेत्रे
, Shaktipeeth Expressway या महामार्गामुळे भाविकांना कमीत कमी वेळेत, अधिक सोयीस्कर प्रवास करता यावा आणि त्याचबरोबर पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळावी असा उद्देश सरकारने स्पष्ट केला आहे.
हे पण वाचा १३० वी घटना-दुरुस्ती विधेयक २०२५ : मंत्र्यांना वेसण की लोकशाहीला आव्हान?
कोल्हापूरमध्ये विरोध का?
कोल्हापूर जिल्ह्यात Shaktipeeth Expressway या महामार्गाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होत होता. या विरोधाची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- सुपीक जमिनींचे भूसंपादन: हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सुपीक शेतजमिनींमधून जाणार होता. शेतकऱ्यांचा असा दावा होता की, या जमिनींवर ऊस आणि इतर नगदी पिके घेतली जातात आणि जर त्या महामार्गासाठी संपादित केल्या तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.
- पर्यायी रस्ते: कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारे अनेक पर्यायी महामार्ग आधीच अस्तित्वात आहेत, ज्यामुळे नवीन महामार्गाची आवश्यकता नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.
- कमी मोबदला: शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी मिळणारा मोबदला त्यांच्या जमिनीच्या किमतीच्या तुलनेत कमी आहे, असा शेतकऱ्यांचा आरोप होता.
- लोकप्रतिनिधींचा पाठिंबा: अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी, जसे की मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार राजू शेट्टी, यांनी शेतकऱ्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला होता, ज्यामुळे हा विरोध अधिक तीव्र झाला.
सरकारचा निर्णय आणि पुढील पाऊले
शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता आणि आगामी निवडणुकांचा विचार करून शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने काढलेल्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळले आहे. याचा अर्थ, आता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा या तालुक्यांमधून होणारे भूसंपादन थांबवले गेले आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, आता या महामार्गाची नवीन आखणी केली जाईल. कोल्हापूर वगळल्यानंतर हा महामार्ग कसा जाणार, यावर लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. यामुळे, या प्रकल्पातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि आंदोलनाचा विजय मानला जात आहे.
या निर्णयामुळे सांगलीसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमध्येही एक आशेचा किरण निर्माण झाला आहे, कारण तेथेही या महामार्गाला मोठा विरोध होत आहे. सरकार इतर जिल्ह्यांबाबत काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.हा महामार्ग जरी वर्धा ते रत्नागिरी असा प्रस्तावित असला तरी, कोल्हापूरच्या भूमिकेमुळे आता तो नागपूर ते गोवा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे.
कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा ठरला निर्णायक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध केला होता. शेतीवर गदा येणार, उपजीविकेचा मार्ग बंद होणार – या भीतीने अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने आणि ग्रामसभा घेऊन सरकारला स्पष्ट संदेश देण्यात आला होता.
त्यावेळी, जनतेच्या रोषाची तीव्रता ओळखून महायुती सरकारने कोल्हापूर जिल्ह्याला Shaktipeeth Expressway महामार्गाच्या भूसंपादनातून वगळण्याचा निर्णय घेतला होता. खुद्द मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान ही माहिती जाहीरपणे दिली होती, ज्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण काहीसे निवळले होते.
पण काही महिन्यांपूर्वी नव्या आदेशानुसार पुन्हा एकदा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा अस्वस्थता पसरली. “आम्ही शब्दांवर विश्वास ठेवला, पण आता आम्हालाच गाफील ठेवले जात आहे” असा सूर शेतकऱ्यांमध्ये उमटू लागला. यामुळे जिल्ह्यातील नेतेमंडळी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची पुन्हा हाक दिली, आणि परिसरात निदर्शने, रस्ता रोको यासारख्या कृतींना उधाण आलं.
या वाढत्या विरोधाची दखल घेत अखेर सरकारने कोल्हापूर जिल्ह्याला भूसंपादन आदेशातून पुन्हा अधिकृतपणे वगळल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि जनतेच्या एकतेचा विजय मानला जात आहे.









